Mul:- भीम जयंतीनिमित्त मूल शहरात येणाऱ्या नागरिक व बांधवांच्या सोयीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र गरज लक्षात घेऊन श्री संतोष भाऊ रावत यांच्या मार्गदर्शनात मूल तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवक विवेक बळवंतराव मुत्यलवार यांच्या पुढाकारातून ‘पानपोई’ सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शहरात येणाऱ्या हजारो नागरिकांना थंडगार व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून, सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजासाठी कार्य करण्याचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून ही पानपोई सुरू करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी मिळून नागरिकांना पाण्याचे वाटप करत सेवा भावना जपली. भीम जयंतीच्या निमित्ताने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणे हीच खरी बाबासाहेबांना अभिवादन असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
विवेक मूत्यलवार यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





