चिचाळा : मौजा चिचाळा व ग्रामपंचायत चिचाळा अंतर्गत येणारे कवडपेठ हे गाव दुर्गम व जंगलालगतचे क्षेत्र असून येथील विद्यार्थ्यांना आजही मूलभूत व आधुनिक शैक्षणिक सुविधांअभावी शिक्षण घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्यरत असल्या तरी स्मार्ट शिक्षण, संगणक सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, शाळा इमारत दुरुस्ती, स्वच्छ शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी, क्रीडा साहित्य व खेळाचे मैदान आदी सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळावे हा शासनाचा उद्देश आहे. मात्र चिचाळा व कवडपेठ येथील शाळा अद्यापही अनेक आवश्यक सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या दोन्ही शाळांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत तात्काळ समावेश करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रविण बोबाटे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्यामार्फत देण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेता शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी बोबाटे यांनी केली आहे. यावेळी राजू सोमणकर, मनोज भुरसे, सूरज टिकले आदी उपस्थित होते.





