बातमी संकलन : यश कायरकर
नागभिड तालुक्यातील चिंधी माल येथे दि. २९/६/२४ शनिवार ला *’साप, सर्पदंश, मृत्यू, अंधश्रद्धा व कायदा’* या विषया अनुषंगाने गावांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्वाब नेचर केअर फाउंडेशन तथा ग्रामपंचायत चिंधी चक यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत चे चिंधी (माल) या गावांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पावसाळ्यामध्ये होणाऱ्या सर्पदंशाच्या घटना मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असते त्यामुळे अशा सर्पदंशाच्या घटना घडू नये व सर्पदंशा नंतर कोणतीही जिवीत हानी होऊ नये. या करीता हा सापांबध्दल चा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी परिसरात आढळणाऱ्या विविध विषारी बिनविषारी व निमविषारी सापाबद्दल मार्गदर्शन करीत. स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सविस्तर माहिती देत सर्पदंशाचे कारण, आणि सर्पदंश टाळून नेण्याकरता घ्यावयाची काळजी, त्यानंतर सर्पदंशामुळे होणारे मृत्यू व त्या मागचे कारण आणि अंधश्रद्धा याबाबतही सविस्तर माहिती देत. “सर्पदंश झाल्यावर तात्काळ रुग्णालयात उपचार करा कोणत्याही नागमोती व मांत्रिकाच्या आहारी जाऊ नका, कोणत्याही सापाचे जहर हे मंत्राने उतरत नसून ते फक्त त्या सापांच्या विषापासून बनलेल्या विष प्रतिरोधक मुळेच उतरू शकते. त्यामुळे नागमोत्यांकडे जाऊन आपले जीव गमावू नका. व जर कोणी असे करत असेल तर त्याकरिता जादूटोणा विरोधी कायदा 2013 च्या कलम 2 (ख), अनुसूची 9 नुसार कठोर कारवाई होऊ शकते. त्यानुसार कमीत कमी 6 महिने अधिक पाच हजार (5000/-) रुपये दंड तर जास्तीत जास्त 7 वर्षे व पन्नास हजार (50000/-) रुपये दंड अशी तरतूद केली आहे.” हे सांगत या कायद्याबद्दल व या कायद्याच्या व्यापकतेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. व “आपले जीव वाचवण्याकरता नागमोत्याकडे (मांत्रिक) न जाता, दवाखान्यातच जाऊन उपचार करा” असे आवाहन यावेळेस यश कायरकर यांनी केले.
सतत वन्यजीव, पर्यावरण, करिता कार्य करणार्या स्वाब संस्थेच्या वतीने पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्यात होणारे सर्प दंश व मृत्यू टाळून नेण्याकरिता, व लोकांचे जीव वाचवण्याच्या उद्देशाने स्वाब संस्थेमार्फत संपूर्ण पावसाळा भर परिसरातील गावांमध्ये हा अवेअरनेस प्रोग्राम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन चिंधी (चक) चे सरपंच हरिदास वरठे, उपसरपंच प्रदिप समर्थ, लिपिक राजेंद्र माहुरे यांनी केले. यावेळी स्वाब संस्था चे पदाधिकारी छत्रपती रामटेके, अमिर करकाडे, नितीन भेंडाळे, महेश बोरकर, सुमीत गुरनूले, विनोद लेनगुरे इत्यादी उपस्थित होते. तर गावातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.





