जवसाची समूह पद्धतीने शेती करणे गरजेचे- डॉ. राजेंद्र गाडे

0
200

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क

अकोला :जवसाची समूह पद्धतीने शेती केल्यास निश्चित शेतक-यांच्या मालाला भाव पण मिळू शकेल. शिवाय जागेवरच मालाची विक्री करता येईल. त्यामुळे शेतक-यांनी जवसाची समूह पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र गाडे यांनी केले.
अखिल भारतीय समन्वयीत जवस संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय नागपूरतर्फे आयोजित जवस प्रशिक्षणाचा समारोप 28 फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील संजय भुस्कडे यांच्या शेतात घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
जवस पिकाचे औद्योगिक महत्त्व बघता महिलांनी यामध्ये एक उद्योजक म्हणून उतरावे, आजच्या आधुनिक युगात महिलांनी सुद्धा शेतीपूरक व्यवसाय अंगीकारून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उद्योजक बनणे आवश्यक आहे. जवसापासून जे 40 प्रकारचे पदार्थ बनविले जातात. त्या पदार्थांकडे सुद्धा शेतकरी महिलांनी व महिला बचत गटांनी लक्ष देणे आवश्यक आहे. जवस पिकाची संजय भुस्कडे यांच्या शेतातील प्रात्यक्षिक बघता हे पीक या भागात खूप चांगल्या प्रकारे येईल असे सिद्ध होते असेही डॉ. राजेंद्र गोडे म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वर्षा टापरे यांनी जवस पिकाचे हरभरा पिकामध्ये आंतरपीक घेण्यावर भर दिला. रब्बी हंगामातील हरभर्याचे क्षेत्र आपण पूर्णपणे कमी करू शकत नाही परंतु त्यामध्ये जर वीस टक्क्यापर्यंत आपण जवस पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव केला तर आपल्याला हरभरा पिकावर येणारी घाटेअळीवर सुद्धा नियंत्रण ठेवता येईल असे सांगितले. जवस पैदासकार डॉ. बिना नायर यांनी जवस पिकाचे महत्त्व व जवसाचे मानवी जीवनात आरोग्यदायी महत्त्व हे उपस्थित शेतकरी बांधवांना समजून सांगितले. यावेळी शेतकरी सुहास भुस्कडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जवस पिकाच्या या प्रशिक्षण व शेती दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिल्पा रणनवरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. स्वप्निल ठाकरे यांनी केले.

Previous articleअकोल्यात किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन
Next articleकायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here