मूल (जि. चंद्रपूर):-
पावसाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतीकामे गती घेत असतानाच मूल तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात झुकलेला वीज पोल मोठ्या संकटाचं निमित्त ठरतोय. या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अकाश येसनकर यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
शेतकरी आदित्य ताराचंद गेडाम यांच्या शेतात विद्युत पोल मागील वर्षीच्या मुसळधार पावसात वाकला. आजही तो तसाच असून, त्या पोलवर विद्युत पुरवठा सुरू आहे. शेतामधून दररोज ट्रॅक्टरची हालचाल, जनावरांची जा-ये व शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष श्रम सुरू असताना, तो पोल जिवघेणा धोका बनून उभा आहे.
शेतकऱ्यांनी वेळोवेळी ही बाब संबंधित यंत्रणेकडे पोहोचवली असली, तरी आजपर्यंत या ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. ही निष्क्रियता पाहून शहराध्यक्ष अकाश येसनकर यांनी स्वतः शेताची पाहणी करून यंत्रणेला सविस्तर निवेदन दिलं आहे. त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे की,
> “हा फक्त एका शेतकऱ्याचा प्रश्न नाही – ही संपूर्ण शेती संस्कृतीच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. कोणतीही जीवितहानी घडण्याआधीच कार्यवाही होणं आवश्यक आहे. शेतकरी आपलं सर्वस्व शेतीत झोकून देत असतो. अशा वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणं अत्यंत वेदनादायक आहे.”
येसनकर यांनी संबंधित विभागाला विनंती केली आहे की, धोकादायक अवस्थेतील झुकलेला पोल तात्काळ बदलण्यात यावा, विद्युत तारांचे पुनर्विन्यास करून संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात यावा, जेणेकरून कोणताही अपघात घडू नये.
या संपूर्ण प्रकरणात , शहराध्यक्षांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सकारात्मक व ठोस कारवाईवर भर दिला आहे. त्यांची भूमिका ही जनतेच्या हितासाठी सजग आणि जबाबदार प्रतिनिधी म्हणून उभी राहिली आहे.





