मूल, ता. १७ : शेतातील पिकाला पाणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा उमा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (ता. १७) सकाळी उघडकीस आली. मृत शेतकऱ्याचे नाव भाऊराव चौखुंडे (वय ५५ रा. मूल) असे आहे.
तालुक्यात सर्वत्र खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. शेतशिवारात धानाचे पर्हे टाकणे, त्यांना पाणी करणे, बियाण्यांची लागवड करणे ही कामे सुरू आहेत. पावसाची प्रतीक्षा असल्याने मोटारपंपाद्वारे पाणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. येथील शेतकरी भाऊराव चौखुंडे हे अंतरगाव पारडवाही या भागात असलेल्या आपल्या शेतात सोमवारी दुपारी गेले होते. धान पऱ्यांना पाणी करण्यासाठी गेले असता त्यांना मोटार पंप नादुरूस्त आढळली.
शेतापासून नजीकच उमा नदीचे पात्र आहे. नदी पात्रातील मोटार पंप आणि पात्रातील पाईप काढीत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते नदीत पडले. त्याच ठिकाणी पाण्याच्या साठयासाठी खड्डा तयार करण्यात आला होता. भाऊराव चौखुंडे यांना पोहता येत नसल्याने पात्रातील पाण्यात त्यांचा बुडून करूण अंत झाला. संध्याकाळी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मंगळवारी सकाळी शोधमोहिमेदरम्यान पात्रातील पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मूल पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.





