बुलडाणा: जात-धर्म -पंथाच्या मर्यादा तोडून साहित्य मानवते कडे जाऊ शकते हे प्रत्यक्ष कृतीतून ज्येष्ठ कवि स्व.सय्यद अहमद यांनी दाखवून दिले. हिंदी भाषिक ,मुस्लिम धर्मीय असूनही हयातभर माय मराठीची सेवा करणारे सय्यद अहमद यांच्या अकाली जाण्याने मराठी साहित्य विश्वाची मोठी हानी झाली असे प्रतिपादन केळवद माजी सरपंच ज्ञानदेव कालेकर यांनी केले. 17 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत मध्ये अभिवादन सभा पार पडली.
ज्येष्ठ कवी सय्यद अहमद मोताळा यांचे दोन दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. राज्यातील विविध साहित्य संमेलनात हमखास निमंत्रित असणारे कवी म्हणून सय्यद अहमद परिचित होते. वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या कविता,कथा, साहित्य जात-धर्म पंथाच्या पलीकडे गेल्या होत्या. राज्याततथा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा चाहता वर्ग होता. केळवद येथे 1990 पासून त्यांचा संबंध आला.कविसंमेलन असले म्हणजे ग्रामवासी आवर्जून सय्यद अहमद यांना आग्रहाने बोलावीत .त्यांच्या निधनाने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. केळवत ग्रामपंचायत मध्ये अभिवादन सभा घेण्यात आली यावेळी सर्पमित्र नंदू आप्पा बोरबळे यांनी स्वर्गीय सय्यद अहमद यांच्या आठवणींना उजाळा दिला.सय्यद अहमद यांच्या चार ओळी एखाद्या कादंबरी एवढा आशय व्यक्त करीत. मुस्लिम धर्मीय असून त्यांनी माय मराठीला कायम आई मानले.कवी संमेलनाचे संचालन करताना इंसान का इंसान के साथ हो भाईचारा हा संदेश त्यांनी दिला. त्यांचे निधन साहित्य विश्वला चटका लावून गेल्याचे नंदूआप्पा यांनी सांगितले. यावेळी गणेश निकम ,राम हिंगे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी गंगागिर गिरी, सुखदेव माहोरे, राजू मोरे ,गोपाल वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.





